पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरेगाव-भीमा येथे शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर आले होते. त्यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणावेळी राजकीय परिस्थिती बदलल्यामुळे राजकीय दंगल घडवली. राज्यात सत्तांतर झाले असताना त्याचाच फायदा घेऊन कोरेगाव-भीमा येथे दंगल घडवण्याचा प्रयत्न होता. हा प्रयत्न आम्ही सत्ताधाऱ्यांसोबत मिळून उधळून लावल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. अजित पवार यांनीही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन केले.
अजित पवार यांनी त्यावेळी येणाऱ्या वर्षात सरकार महिलांची सुरक्षितता, रोजगार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि मंत्री नितीन राऊतही कोरेगाव-भीमा येथे येणार असून परिसरात शांतता राहावी यासाठी पोलीस आणि प्रशासनाने चांगलाच बंदोबस्त केला आहे.
२०१८ प्रमाणे कोरेगाव-भीमा येथील परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांनी सगळी खबरदारी घेतली असून ७४० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियावरही पोलिसांची नजर असून कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट पसरणार नाहीत, याची काळजी पोलिसंनी घेतली आहे. यासाठी अगोदरच २५० पेक्षा अधिक व्हॉट्सअॅप ग्रुपच्या ऍडमिन्सला नोटीस देण्यात आली आहे.
Visit : bahujannama.com