बहुजननामा ऑनलाइन टीम – तुफान ज्यादा हो तो, कश्तियाँ डूब जाती है, और घमंड ज्यादा हो तो, हस्तियाँ डूब जाती है, अशा शब्दात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री अमित शाहा यांना टोला लगावला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्व सिद्धांतांना तापी नदीत बुडवून शिवसेनेने राज्यात सत्ता मिळवली. पण आम्ही तुमच्या मार्गाने चालणार नाही. आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो तर शिवसेनाच उरली नसती, असे वक्तव्य शाह यांनी केले होते. यावरून खासदार राऊत यांनी ट्विट करून शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपासोबतची तब्बल 25 वर्षाची युती तोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केले. त्यानंतर जवळपास दीड वर्षांने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवरून निशाणा साधला. सिंधुदुर्गमध्ये रविवारी (दि. 7) नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी अमित शाह बोलत होते. यावेळी त्यांनी थेट शिवसेनेवर निशाणा साधला. आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो तर शिवसेनाच उरली नसती, असे विधान त्यांनी केले होते.
जय हिंद !!!
जय महाराष्ट्र !!! pic.twitter.com/Z5icLpoNs9— Sanjay Raut (@rautsanjay61) February 8, 2021
त्यानंतर खासदार राऊत यांनी कालच शाह यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. 1975 मध्ये रजनी पटेल आणि 90 च्या दशकात कदाचित मुरली देवरा यांनी शिवसेना संपेल असे भाकित केले होते. 2012 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्याच गोष्टीचा पुनरूच्चार केला होता. मात्र दोन्ही वेळा शिवसेना आधीपेक्षा अधिक ताकदीनिशी पुढे आली. जय महाराष्ट्र, असे ट्विट करत संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यांनतर हा वाद इथेच न संपता संजय राऊत यांनी आज पुन्हा ट्विट करत अमित शाह यांना टोला लगावला आहे.