बहुजननामा ऑनलाइन टीम – एका 27 वर्षीय नौदल सैनिकाचे अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पालघर जिल्ह्यातील तलासरीतील वेवजी गावच्या जंगलात ही घटना घडली असून यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, खून झालेल्या सैनिकाने आपल्या भावी पत्नीच्या घरून 9 लाख रुपये घेतल्याचे उघड झाले आहे. शेअर बाजारात गुंतवलेल्या पैशांच्या देवाणघेवाणीतून त्याचा खून झाल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. जिल्ह्यातील साधू हत्याकांडानंतर अतिशय निर्घृणपणे नौसैनिकाचेही हत्याकांड झाल्याचे समोर आल्याने पोलिसांच्या कामगिरीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
सुरजकुमार (वय 27) असे खून झालेल्या नौदल सैनिकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरजकुमार यांने 1 फेब्रुवारी रोजी आपल्या एटीएमचा वापर करून होणाऱ्या वागदत्त वधूच्या घरून 9 लाखांची रक्कमही घेतल्याची बाब समोर आली आहे. लग्नाआधीच 9 लाख कशासाठी घेतले होते. याची माहिती पोलीस घेत आहेत. दरम्यान, मित्रांकडून अथवा एखाद्या खाजगी व्यक्तीकडून कर्जाऊ रूपाने घेतलेल्या पैशांच्या देवाणघेवाणीवरून हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी याप्रकरणी 10 पथके बनविण्यात आल्याची माहिती दिली असून या प्रकरणाचा कसून शोध घेण्यात येत आहे.
दरम्यान तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्र अशा चार राज्यांच्या सीमा ओलांडून त्याला महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात आणून जाळण्यात आले. ही बाब गंभीर असून भाजप आमदार राम कदम यांनी साधूंच्या हत्याकांडानंतर आता एका नौदल तरुणाचा जाळून खून केल्याने पालघर पोलिसांचा कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.