बहुजननामा ऑनलाईन टीम : महाराष्ट्रातील निवडणुकांचे निकाल लागून जवळपास महिनाभराचा कालावधी लोटला, परंतु सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय उलथापालथ आद्यपही सुरूच आहे. भाजपसोबत न जमल्याने राष्ट्रवादी-कॉंग्रेस त्यांच्याबरोबर येऊन सरकार स्थापन करेल अशी शिवसेनेला आशा आहे. परंतु, गेल्या २४ तासात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अशी दोन विधाने दिली आहेत, ज्यामुळे शिवसेनेच्या अडचणी वाढू शकतात.
सध्या महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत कोणतीही चर्चा नाही, असे शरद पवार सातत्याने सांगत आहेत. मंगळवारी संसद भवनात पोहोचल्यानंतर प्रसारमाध्यमांनी महाराष्ट्रात सरकार स्थापनेविषयी पवारांना विचारणा केली. यावर शरद पवार यांनी त्यांच्याच शैलीत उत्तर दिले आणि म्हणाले , मला हे प्रश्न विचारू नका, ज्यांना सरकार स्थापन करायचे आहे त्यांना प्रश्न विचारा. तसेच सोमवारी शरद पवार कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटायला पोहोचले तेव्हा महाराष्ट्रात सरकार स्थापनेवरील निर्णय घेण्यात येईल अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत पवार म्हणाले की, या बैठकीत सरकार स्थापनेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. कॉंग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक लढविली आहे, त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांत पुढच्या रणनीतीवर बोलणी सुरू आहेत.
दरम्यान, शरद पवारांचा यांच्या या विधानसदर्भात संजय राऊत यांनी विचारले असता ते म्हणाले की, शरद पवारांना समजण्यासाठी बरेच जन्म घ्यावे लागतील. शरद पवार यांच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असून, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होईल, असे शिवसेना नेते म्हणाले. त्याचबरोबर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आम्ही सरकार स्थापन करू असा दावा राऊत यांनी केला. सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या बैठकीत दोन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून पुढच्या भूमिकेबद्दल विचार करतील असा निर्णय घेण्यात आला. ही बैठक मंगळवारी दिल्ली येथे होणार होती, परंतु ही बैठक मंगळवारी दुपारपर्यंत रद्द करण्यात आली. वास्तविक, आज माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती आहे, त्यामुळे कॉंग्रेसचे नेते तिथे व्यस्त आहेत, म्हणूनच ही सभा रद्द करण्यात आली.
Visit : bahujannama.com