बहुजननामा ऑनलाईन टीम : महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत अनेक हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे राज्यात कोणाचे सरकार येणार याबाबत अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. सट्टाबाजारतही महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरून अनेक चर्चा सुरु आहेत. महाराष्ट्रात सत्ता कोणाची येणार ते मुख्यमंत्री कोण होणार ? यावर सट्टाबाजारात शेकडो कोटींचा सट्टा लागला आहे. दरम्यान, सट्टाबाजारानुसार राज्यात महाशिवआघाडीचं सरकार येण्याची सर्वाधिक शक्यता आहे.
दरम्यान, सट्टाबाजारात जे घडण्याची शक्यता अधिक असते त्यावर सर्वात कमी दर लावण्यात येतो. त्यामुळे महाशिवआघाडीसाठी सट्टाबाजारात ३५ पैसे भाजपची सत्ता येईल या अंदाजावर तब्बल ६ रुपयांचा दर लावण्यात आला आहे. तर सट्टाबाजारात मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाला पसंती दिली जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या नावावर ६५ पैसे, एकनाथ शिंदे यांच्यावर २ रुपये, आदित्य ठाकरे यांच्यावर ६ रुपये आणि अशोक चव्हाण यांच्यावरही ६ रुपयांचा दर लावण्यात आला आहे. तर भाजपचा कोणताही नेता मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नाही.
दरम्यान, निवडणुकीच्या निकालानंतर सट्टाबाजाराचे अंदाज वेगळे होते. निकालानंतर मुख्यमंत्रिपदासाठी सट्टाबाजाराने भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती दर्शवली होती. तेव्हा मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर ३० पैसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावावरही ३० पैसे तर काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांच्यावर २ रुपयांचा सट्टा लागला होता. मात्र शिवसेनेनं युतीतून बाहेर पडत काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केल्याने हे नवीन अंदाज वर्तविले आहे.
Visit : bahujannama.com