सांगली : बहुजननामा ऑनलाईन – जुलै महिन्यात जिल्ह्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा काही फायदा झाला नाही. कोरोनाचा वाढता उद्रेक रोखण्यासाठी त्याची साखळी तोडणं गरजेचं आहे. त्यासाठी पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनची गरज आहे असं माझं मत आहे. यावर सर्वांशी बोलून निर्णय घेऊ अशी मााहिती पालकमंत्री जयंत पाटली यांनी दिली. त्यांनी सांगलीतील पत्रकारांशी कोरोना स्थितीबाबत ऑनलाईन संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, “मध्यंतरी केलेल्या लॉकडाऊनचा काही उपयोग झाला नाही. बाजारात फिरताना नागरिकांना कोरोनाची भीती वाटत नाही असं दिसतंय. कोरोना वाढत आहे. रुग्णांना बेडही मिळत नाही. ऑक्सिजन, व्हेंटीलेटर यांचाही तुटवडा आहे असं चित्र आहे.”
पुढे बोलताना पाटील म्हणाले, “कम्युनिटी स्प्रेडींग सुरू आहे. प्रशासनानं खासगी रुग्णालये अधिग्रहित केली आहेत. परंतु तिथल्या कारभाराबद्दल तक्रारी येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घ्यावी आणि कारवाई करावी. ग्रामीण भागात चांगली उपचाराची सोय उपलब्ध केली तर सांगली, मिरजेवर त्याचा ताण पडणार नाही यासाठी प्रयत्न करावेत” अशी सूचनाही त्यांनी जिल्हाधिकारी डॉ चौधरी यांना केली.
पाटील म्हणाले, “कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी यंत्रणा, मनुष्यबळ अपुरं पडत आहे. त्यामुळं मुंबईतील डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफला पाचारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईचे आयुक्त चहल यांना यंत्रणा देण्याची सूचना करणार आहे. ऑक्सिजन पुरवठा, व्हेंटीलेटर्स उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जी यंत्रणा बाहेर मिळेल ती आणू. जिल्हाधिकाऱ्यांसोबत लवकरच जिल्ह्यात फिरणार आहे. सर्व यंत्रणेची पाहणी करून माहिती घेऊ. नवीन मशीन खरेदी करू. कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड होत आहे. त्याला रोखण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू” असंही ते म्हणाले.