मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – लोअर परळ येथील कामगार स्टेडियममध्ये आरपीआय (ए) गटाचा मेळावा संपन्न झाला. मेळाव्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुंबईच्या जागेची मागणी केली आहे. मी २० वर्षांपूर्वी दक्षिण मध्य मुंबई या मतदार संघामधून निवडून आलेलो होतो. आता शिवसेनेनं मोठ मन करून हा मतदार संघ माझ्यासाठी सोडावा असे आठवले म्हणाले, भाजपने मला दक्षिण मुंबईची जागा सोडून शिवसेनेशी चर्चा करून त्यांना दुसरी एखादी जागा द्यावी. याबाबत मी मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
इंदू मिल स्मारक उभारणीचे काम सुरू झाले. जे काँग्रेसच्या काळात झाले नाही. ते भाजप सरकारच्या सत्तेत झाले आहे. बाबासाहेबांचा ३५० फुटाचा पुतळा इंदूमिलमध्ये बांधण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधान मोदी हे दलित विरोधी नाहीत. ते आंबेडकरांना माननारे असल्याचेही मत आठवले यांनी यावेळी व्यक्त केले. काँग्रेस राष्ट्रवादीची गाडी काही चालत नाही. कारण आपली गाडी त्यांच्या पुढे आहे. मुंबईत पक्षाचे १० ते १२ नगरसेवक निवडून आणायचे आहे. महाराष्ट्रात २ ते ३ खासदार असले पाहिजे. तसेच आपल्या चळवळीला कोणी विनाकारण बदनाम करत असेल तर त्याला धडा शिकवला पाहिजे, असेही आठवले यांनी सांगितले.
माझ्यामागे लोकं आहेत की नाही, असे बोलणाऱ्यांनी कामगार स्टेडियम येथे यावे, अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर केली. माझे मंत्रिपद हे माझे नसून तुमचेही आहे. आरक्षणाला धक्का न लागण्यासाठी मी त्यांच्या मंत्रीमंडळात आहे, असे स्पष्टिकरणही त्यांनी यावेळी दिले.