भंडारा : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील इतर मागास प्रवर्गातील इयत्ता ५ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी सन २०१९-२० पासून शासनाच्या विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाने ‘सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू केली असून त्याअंतर्गत इयत्ता ५ ते ७ वीच्या विद्यार्थिनींना दरमहा ६० रुपये तर इयत्ता ८ ते १० वीच्या विद्यार्थिनींना दरमहा १०० रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
त्यात कसलीही उत्पन्नाची अट नसून एकूण दहा महिने शिष्यवृत्ती मिळणार आहे. राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, धनगर, वंजारी व विशेष मागास प्रवर्गातील मागासवर्गीय मुलींचे प्राथमिक शाळांमधील गळतीचे प्रमाण रोखण्याच्या दृष्टिकोनातून इयत्ता ५ वी ते ७ वी पर्यंतच्या मुलींकरिता ‘सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना’ १२ जानेवारी १९९६ पासून राज्यात लागू करण्यात आलेली आहे.
त्याच धर्तीवर राज्यातील इतर मागास प्रवर्गातील मुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी त्यांचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, शैक्षणिक सर्वांगीण विकास व्हावा म्हणून राज्यातील इयत्ता ५ वी ते इयत्ता १० वी मधील इतर मागास प्रवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आलेली आहे.