मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा दाखला देत पोलीस अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग आणि बदलीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन टॅपिंगप्रकरणी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना अहवाल सुपूर्द करण्यास सांगितले होते. त्यानुसार सीताराम कुंटे यांनी गुरुवारी (दि.25) पाच पानांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केला. यामध्ये त्यांनी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगसाठी मिळालेल्या परवानगीचा गैरवापर कल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्लांचा फोन टॅपिंग अहवाल लीक झाल्याप्रकरणी मुंबई राज्य गुप्तवार्ता विभागाने अज्ञात व्यक्ती विरोधात आज (शुक्रवार) तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाने राज्य गुप्तवार्ता विभाग येथील गोपनीय पत्र आणि इतर तांत्रीक गोपनीय माहिती बेकायदेशीरपणे प्राप्त केली. याकरीता भारतीय टेलीग्राफ अॅक्ट 1885 कलम 30 सह The official secrets act, 1923 च्या कलम 5 अन्वये अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पहिला तपास सहाय्यक पोलीस आयुक्त, सायबर विभाग, गुन्हे शाखा मुंबई करीत आहेत.
सीताराम कुंटे यांनी CM ठाकरेंना सादर केलेल्या अहवालात काय म्हटलंय ?
मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी गुरुवारी (दि.25) संध्याकाळी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या चौकशी अहवालात म्हटले आहे की, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी शासनाची दिशाभूल करुन काही खासगी व्यक्तींचे फोन टॅप केले. त्यांची ही कृती भारतीय टेलिफोन अॅक्टचा गैरवापर करणारी आणि संबंधित व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे, असा गंभीर ठपका अहवालात ठेवला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सरकार काय निर्णय घेते याकडे लक्ष्य लागले होते.
मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी काल वस्तुस्थितीदर्शक अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला. आतंकवाद, दहशतवाद, दंगली घडवणे यासारखे कृत्ये करणे यासाठी काही खाजगी व्यक्तींचे फोन टॅप केले जातात. त्यासाठी शुक्ला यांनी परवानगी मागिली होती. इंडियन टेलिग्राम अॅक्टनुसार राजकीय मतभेद, व्यवसायिक तंटे, कौटुंबिक कलह अशा स्वरुपाच्या प्रसंगामध्ये फोन टॅपिंग करणे अभिप्रेत नाही. परंतु या प्रकरणात मूळ उद्देशापेक्षा वेगळ्या प्रयोजनासाठी या तरतुदीचा गैरवापर करुन शासनाची दिशाभूल केल्याचे दिसून येते. ही बाबत गंभीर असल्याने रश्मी शुल्का यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले होते.
रश्मी शुक्ला यांनी माझी, तसेच गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांची व्यक्तिश: भेट घेतली होती. त्यांनी झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. त्याप्रमाणे त्यांच्या कौटुंबिक व्यथा विशेषत: त्यांच्या पतीचे कॅन्सरने झालेले निधन, त्यांची मुले शिकत असल्याचे सांगितले. त्यांनी आपली चूक कबूल करुन दिलेला अहवाल मागे घेण्याची परवानगी मिळावी यासाठी विनंती केली होती. मात्र, शासनाकडे सादर केलेला अहवाल परत देण्याचा कोणताही प्रघात नसल्याने तशी कारवाई करण्यात आली नाही.
याशिवाय एक महिला अधिकाऱी असल्याने व त्यांनी त्यांची चूक कबुल केल्यामुळे, तसेच पतीचे निधन, मुलांचे शिक्षण ही बाब निदर्शनास आणल्याने सहानुभूती व सौजन्याच्या दृष्टीकोनातून त्यांच्यावर प्रस्तावित कारवाई करण्यात आली नाही. दरम्यानच्या कालावधीमध्ये त्यांची केंद्रीय प्रतिनियुक्तीवर बदली झाली, असे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.