पुणे : बहुजननामा ऑनलाइन – बुधवारी रात्रभर सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यात हाहाकार माजला आहे. या पावसामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून असंख्य नागरिकांच्या गाड्या देखील वाहून गेल्या आहेत. भिंती कोसळत आहेत, तर दुसरीकडे कामावरून परतताना एक महिला गाडीसकट पुऱ्याच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. नांदेड सिटीमध्ये राहणार्या अमृता आनंद सुदामे या धायरी येथील पुलावरून दुचाकीवरून जाताना हि घटना घडली. या घटनेत अमृता यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर अमृता सुदामे यांच्या बहीण निशा वायकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “अमृता ही नेहमीप्रमाणे दुपारी एक वाजता कामास गेली होती, रोजच्याप्रमाणे ती साधारण साडेदहा वाजता घरी येत असते. मात्र, बराच वेळ झाल्यावरही अमृता घरी न आल्याने आम्ही आसपासच्या भागात तिचा शोध घेतला. शेवटी आम्ही पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतल्यावर तब्बल ८ तासांनंतर ‘सनसिटी’च्या बाजूला असलेल्या क्रिकेटच्या मैदानावर पोलिसांना मृतदेह आढळून आला”. दरम्यान अमृता यांचे पती कामानिमित्त मुंबईला गेले होते, यांच्या पश्चात आता दोन मुली असल्याची माहिती मिळाली आहे.
पुण्याचे पोलीस आयुक्त डी. वेंकटेशम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे बहुतेक ठिकाणी पुराणे थैमान घेतले आहे. अनेक रस्ते, पूल वस्त्या पाण्याखाली गेले आहेत. पावसामुळे अनेकांना जागून रात्र काढावी लागली. आतापर्यंत या पावसाने एकूण १२ जणांचे बळी घेतल्याची माहिती दिली. तसेच अनेक जण बेपत्ता आहेत.
Visit : bahujannama.com