बहुजननामा ऑनलाईन – शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने संसर्ग झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यापार्श्वभूमीवर बहुतांश आयटी कंपन्यांनी धसका घेतला आहे. त्यासाठी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दक्षतेच्या सूचना देत ऑफिसमध्ये न येता घरातूनच काम करण्याच्या (वर्क फ्रॉम होम) सूचना दिल्या आहेत.
कोरोना रोगामुळे अनेक आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करायला सांगितले आहे. पिंपरी चिंचवड परिसरात हिंजवडी, वाघोली, तळवडेतील आयटी पार्कमध्ये अनेक आयटी कंपन्या आहेत. दररोज हजारो कर्मचारी आणीनअधिकारी कंपन्यांमध्ये काम करतात. दरम्यान मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आयटी कंपन्यांनी विशेष दक्षता घेऊन कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सूचना केली आहे. सर्वच आयटी कंपन्यांचे काम इंटरनेट आणि संगणकावर चालते. त्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामासाठी ऑफिसमध्येच जाण्याची आवश्यकता नसते. घरी इंटरनेट, संगणक अथवा लॅपटॉप असल्यास आयटी कर्मचाऱ्यांना घरात बसून त्यांचे ऑफिसचे काम करता येते.
कंपनीत शेकडो, हजारो कर्मचाऱ्यांना एका ठिकाणी कामासाठी यावे लागत असल्याने त्यातून विषाणू संसर्ग होण्याची भीती असल्याने अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.कंपनिशिवाय काम करणे शक्य नाही, अशा कर्मचाऱ्यांनाच कंपनीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, त्यांना सर्दी, खोकला, ताप नाही ना, याची खातरजमा करून घेण्याच्या सूचना सुरक्षा विभागाला देण्यात आल्या आहेत. दरम्यान, हिंजवडी परिसरात वाहतूक कोंडीची समस्या ही दररोजची डोकेदुखी ठरत आहे. ‘वर्क फ्रॉम होम’च्या प्रयोगामुळे हिंजवडीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या घटणार असल्याने काही दिवस वाहतुकीवरील ताण कमी होण्याची शक्यता आहे.