बहुजननामा ऑनलाईन टीम – काँग्रेस पक्षात अध्यक्षपदावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं दिसत आहे. काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहत नेतृत्व बदलाबाबत मागणी केली होती. यानंतर या नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेते संतापले आहेत. कपिल सिब्बल यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. अशातच आता गुलाम नबी आझाद यांनीही राहुल गांधी यांच्या विधानावर आक्षेप घेतला आहे.
गुलाम नबी आझाद म्हणाले…
राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांप्रमाणे जर मी भाजपशी कोणत्याही हातमिळवणी केली आहे असं निष्पन्न झालं तर मी राजीनामा देईन असं थेट आव्हानच गुलाम नबी आझाद यांनी केलं आहे. काँग्रेसची कार्यसमिती ही असे पत्र लिहिण्याचं कारण असल्याचंही त्यांनी सांगितलं.
काय म्हणाले होते राहुल गांधी ?
राहुल गांधी यांनी असा आरोप केला होता की, पक्षात सुधारणा घडवून आणण्यासाठी काही नेत्यांनी लिहिलेलं पत्र हा भाजपशी हातमिळवणी केल्याचा परिणाम आहे. या पत्राच्या वेळेवरही राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
प्रियंका गांधी म्हणाल्या…
दरम्यान आता गुलाम नबा आझाद यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाबद्दल प्रियंका गांधी यांनीही नारीजी व्यक्त केली आहे. आझाद जे काही सांगत आहेत त्याच्या एकदम विरुद्ध मत त्यांनी पत्रात लिहलं आहे असं प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत.
कपिल सिब्बलांनी दिलं राहुल गांधींना प्रत्युत्तर
कपिल सिब्बल यांनीही ट्विट करत आक्रमकपणे राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं होतं. त्यांनी लिहिलं की, “आम्ही भाजपशी संगनमत केलं असं राहुल गांधी म्हणतात. राजस्थानात उच्च न्यायालयात पक्षाची बाजू यशस्वीपणे मांडली. मणिपूरमध्ये भाजप सरकारविरोधी बाजू मांडली. गेल्या 30 वर्षात भाजपच्या पथ्थ्यावर पडेल असं एकही विधान केलं नाही. तरीही आम्ही भाजपशी हात मिळवणी केल्याचं बोललं जात आहे.” असं म्हणत सिब्बल यांनी नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीपूर्वी ज्या 23 नेत्यांनी पत्र लिहिलं त्यात गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांचाही समावेश होता.
सोनिया गांधींना लिहलेल्या पत्रात नेमकं काय ?
देशभरातील काँग्रेसच्या 23 वरिष्ठ नेत्यांनी पक्षात मोठ्या बदलांची गरज आहे असं मत पत्र लिहित व्यक्त केलं होतं. पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष आहे अशी महत्त्वाची मागणी 23 नेत्यांनी या पत्रात केली होती. यात काँग्रेस कार्यसमितीच्या अनेक सदस्यांसह 5 माजी मुख्यमंत्री, खासदार आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश होता. पक्ष जनाधार आणि तरुणांचा विश्वास गमावत आहे. पक्षाला प्रभावी नेतृत्वाची गरज आहे. तो केवळ काम करताना दिसू नये तर त्याचं काम प्रत्यक्ष जमिनीवर दिसायला हवं. सीडब्ल्यूसीची निडवणूक व्हायला हवी आणि पक्षानं पुन्हा उभारी घ्यावी यासाठी काही ठोस योजना तयार करायला हवी असं 23 नेत्यांनी पत्रात म्हटलं आहे.