नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. शेकडो लोक घरात बंद आहे. भारतात सुद्धा याचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन सुरु आहे. या परिस्थितीत अनेक लोक, संस्था मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. ज्यात भारतीय विमान कंपनी एअर इंडियाचा सुद्धा समावेश आहे. कोरोनासारख्या संकटाच्या काळात लोकांना सुरक्षित पोहोचविण्यासाठी एअर इंडियाने सतत उड्डाणे केली आहेत. पाकिस्ताननेदेखील एअर इंडियाच्या या कामगिरीला सलाम केला आहे. पाकिस्तानचे एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) यांनी संकटाच्या काळात लोकांची मदत केल्याबद्दल एअर इंडियाचे कौतुक केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे भारतात अडकलेल्या युरोपीयन नागरिकांना विमानाने फ्रँकफर्टला सुखरूप पोहोचविण्यात एअर इंडियाचा मोठा वाटा आहे. यासंबंधीची माहिती एअर इंडियाच्या एका वरिष्ठ कॅप्टनने देताना म्हंटले कि, ” आम्ही पाकिस्तानच्या हवाई हद्दीत गेलो असता, एअर ट्रॅफिफ कंट्रोलरने आमचे स्वागत केले. कंट्रोलरने म्हटले की, मदत पुरवठा करणार्या एअर इंडियाच्या विमानाचे स्वागत आहे.”
पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरने या उड्डाणावेळी एअर इंडियाच्या पायलटला विचारले, ‘कन्फर्म करा, आपण मदत सामग्रीसह फ्रँकफर्टला जात आहात?’ त्यानंतर भारतीय पायलटने ‘होय’ असे उत्तर दिले. ज्यांनंतर पाकिस्तानी एअर ट्रॅफिक कंट्रोलरने भारतीय विमानांना पुढील आवश्यक सूचना दिल्या आणि अखेरीस एअर इंडियाचे कौतुक करत म्हटले की, ‘आम्हाला अभिमान आहे. अशा प्रकारची साथीची घटना घडली तरी तुमचे विमान उड्डाण करत आहे. शुभेच्छा!’ त्यानंतर कौतुक केल्याबद्दल भारतीय पायलटने पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरचे आभार मानले.
दरम्यान, जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आतापर्यंत ११ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर मृतांची संख्या ६३ हजारावर पोहोचली आहे. भारतातही संक्रमितांचा आकडा ३ हजारहून जास्त आहे.