बहुजननामा ऑनलाईन टीम : विधानसभा निवणुकीचा निकाल लागून इतके दिवस झाले असले तरी देखील सत्ता स्थापनेला अजूनही मुहूर्त लागला नाही. पण आता महाराष्ट्रात पुढील सरकार स्थापन करण्यासाठी व अनेक दिवसांपासून लांबणीवर असलेला सत्ता स्थापनेचा प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाची सर्व स्तरावर चर्चा सुरु असून पुढची बैठक मुंबईमध्ये होणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांना दिली आहे.
पृथ्वीराज चौहान म्हणाले की, ‘कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सर्व मुद्द्यावर चर्चा केली आहे. त्याचबरोबर या सर्व मुद्द्यांवर आमचे एकमत झाले आहे. उद्या मुंबईला गेल्यानंतर आमच्या मित्र पक्षांशी चर्चा होणार आहे आणि त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची संयुक्त बैठक मुंबईमध्ये पार पडेल.’
सत्ता स्थापनेचा फॉर्मुला नेमका काय असेल त्याचबरोबर कोणाला किती मंत्रिपद दिले जाणार याबाबत चौहान यांना विचारले तेव्हा त्यांनी याबाबतची सर्व माहिती दिली जाईल असे सांगितले. झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांचे एकमत झाल्यामुळे लवकरच राज्यात सरकार स्थापन होईल, असा देखील विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. त्यासंबधीच्या हालचालींसाठी दिल्लीमध्ये गेलेले सर्व नेते मुंबईच्या दिशेने गेले असल्याचे देखील माहिती चौहान यांनी दिली. आघाडीसोबत शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यात जर यश आले तर तब्बल वीस वर्षानंतर शिवसनेचा मुख्यमंत्री राज्यात होईल. यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व एकनाथ शिंदे यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहे.
Visit : bahujannama.com