मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा जवळपास सुटला असून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झालं आहे. लवकरात लवकर सरकार यावं यासाठी जोरदार हालचाली सुरु आहेत. दिल्लीतून काँग्रेस श्रेष्ठींनी महाशिवआघाडीला हिरवा कंदील दाखवल्यानंतर पुढील चर्चेसाठी तिन्ही पक्षातील प्रत्येकी तीन नेत्यांची मुंबईत बैठक होणार आहे. यामध्ये सत्ता वाटपाचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम निश्चित होईल. दरम्यान, काल रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेससचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेलं भाकीत खरं ठरणार का, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
‘भाजप आणि शिवसेना निवडणुका एकत्र लढवणार आणि निवडणुकीनंतर शिवसेना राष्ट्रवादी पक्षासोबत जाणार आणि भाजप विरोधी पक्षात बसणार, हा काय पत्त्यांचा क्लब आहे का ? माझे पिसून झाले, आता तुझे पिस म्हणायला’’, असं भाष्य राज ठाकरे यांनी दोन वर्षांपूर्वी नाशिकमधील एका सभेत केलं होतं. शिवसेनेचे मंत्री आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरत आहोत, असं जेव्हा जाहीरपणे सांगत होते, त्यावेळी राज यांनी हे विधान केलं होतं.
जास्त जागा मिळूनही भाजपाला शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या भूमिकेवर अडून असल्यामुळे राज्यात सरकार स्थापन करता येणार नाही. शिवसेना आता एनडीएमधून बाहेर पडली आहे. त्यामुळे भाजपसोबत काडीमोड घेतलेल्या शिवसेनेने आता आघाडीसोबत जाऊन सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू आहे. त्यात कॉंग्रेस अध्यक्षा सोनीया गांधी यांनी महाशिवआघा़डीला हिरवा कंदील दाखवल्याने तिन्ही पक्षांमध्ये सध्या बैठकांचं सत्र सुरू आहे. आता तीन पक्षांत समान जागा वाटपावर चर्चा सुरु आहे. यानंतर त्यांच्याकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल. महाशिवआघाडीच्या सरकारमुळे सर्वात जास्त मिळालेल्या भाजपाला विरोधी बाकड्यावर बसावं लागणार आहे.
Visit : bahujannama.com