बहुजननामा ऑनलाईन टीम : दिल्लीतील काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी महाशिवआघाडीला हिरवा कंदील दाखविल्याने महाराष्ट्रात शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत सरकार स्थापन करणार हे जवळपास निश्चित झाल आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत याबाबत अंतिम निर्णय होईल. महाराष्ट्रात शिवसैनिकच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. एवढेच नाही तर पुढील पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, असा आणखी एक नवा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला असून सोबतच ‘आता इंद्रपद दिलं तरी माघार नाही,’ अशा शब्दात त्यांनी भाजपला टोला लगावला आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच महाराष्ट्राचे नेतृत्त्व करावे, ही जनतेची इच्छा असून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षात यासंदर्भात एकमत झाल्याचेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे महाराष्ट्राला लवकरच कणखर नेतृत्त्व मिळणार आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असून अडीच नव्हे पुढील पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल. तसेच भाजपकडून प्रस्ताव आलेला नाही, असे सांगत मुख्यमंत्रिपदाचे काय इंद्रपद दिलं तरी आता माघार नाही, असे टोला राऊतांनी भाजपला लगावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना खासदार संजय राऊत यांचेदेखील नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे बोलले जात आहे. सोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, युवासेना प्रमुख आणि नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांच्या नावाचीही चर्चा होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संजय राऊत यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती मिळाली.
मात्र संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे.दरम्यान सरकार स्थापनेसाठी काँग्रेसने मंजुरी दिली असून किमान समान कार्यक्रमावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यासाठी समन्वय समितीची स्थापना केली जाणार आहे. काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. सत्तेचा नव्या फॉर्म्युल्यानुसार ११-११-११ या सूत्रानुसार सत्तेचं वाटप होणार आहे. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या जागांत फारसा फरक नसल्याने राष्ट्रवादीकडून अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी होत अल्याची चर्चा आहे. त्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले कि, सत्तास्थापनेच्या ५०-५० फॉर्म्युल्यानुसार मुख्यमंत्रिपदाची पहिली टर्म शिवसेनेला मिळेल, अशी बैठकीत चर्चा झाली असून साहजिकच दुसऱ्या टर्ममध्ये मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे.
Visit : bahujannama.com