सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील मतदान संपले असून लोकांना आता (२३ मे )निकालाचे वेध लागले आहेत .लोकसभेनंतर लगेच विधानसभेची निवडणूक होणार आहे.त्यापार्श्वभूमीवर राजकीय मंडळी लगेच विधानसभेच्या मोर्चे बांधणीला लागले आहेत .त्यातच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. विधानसभेच्या राज्यातील सर्वच्या सर्व जागा स्वतंत्र लढविणार आहे, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली आहे .
पंतप्रधान पदाबाबत राहुल गांधी यांच्यापेक्षा मायावती यांना आपला पाठिंबा असेल मात्र शरद पवारांचा विषय आलाच तर त्यांना पाठिंबा देणार नाही असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले .
लोकसभा निवडणूक लढविताना आम्ही विधानसभेचा निर्णय पक्का केला होता. विधानसभेला काँग्रेससोबत आघाडीचा अजिबात विचार नाही. प्रस्ताव आला तरी विचार होणार नाही. वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले .