सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – देशातील निवडणुका अंतिम टप्प्यात असून आता सगळ्यांना २३ मे नंतर काय निकाल लागणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्यातच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निकालाबाबत मांडण्यात येणारे सगळे अंदाज चुकणार असून यंदा निकाल वेगळे लागतील, असा दावा आंबेडकर यांनी केला आहे .लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी दौऱ्यासाठी आले होते. यावेळी ते बोलत होते.
दुष्काळाबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात काही मंडळी सातत्याने पाणी पळवित असल्याने इतर जनतेच्या माथी हा दुष्काळ येत आहे.यामुळे या नेत्यांना निवडणुकीत हरवून तुमचा दुष्काळ हटवा. ब्रिटिशांनी कोकणातील नद्यांची तोंडे पश्चिम महाराष्ट्राकडे वळविल्याने येथे पाण्याचा उपलब्धता मोठी असली तरी नियोजनाच्या अभावामुळे सातत्याने दुष्काळाचे संकट येत असल्याचे त्यांनी सांगितले.
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आले असता येथूनच आंबेडकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन लावून छावण्यांचे अनुदान आणि इतर दुष्काळी प्रश्नाबाबत चर्चा केली. आंबेडकरांनी सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला.