मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने नागरिकत्व सुधारणा कायदा व एनआरसीच्या विरोधात गुरूवारी धरणे आंदोलन आयोजित केले. यावेळी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलकांना संबोधित केले. भाजपकडून देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न सुरु असा आरोपी त्यांनी यावेळी केला. काही लोकांचा मताधिकार काढून घेण्यासाठी मोदी सरकारला राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) लागू करायची आहे, असा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला.
आंबेडकरांच्या भाषणानं आंदोलनाची सांगता झाली. आंबेडकरांनी राष्ट्रीय नागरिकत्व कायद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचा समाचार घेतला. एनआरसीचा फटका केवळ मुस्लिमांना बसणार नाही. तो हिंदूंनादेखील बसेल, असं आंबेडकर म्हणाले. चाळीस टक्के हिंदूंना एनआरसीमुळे त्रास सहन करावा लागेल. तुम्ही कादगपत्रं दिली नाहीत, तर तुम्हाला डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवण्यात येईल. जर तुम्हाला डिटेन्शन सेंटरमध्ये जायचं नसेल तर हे सरकार पाडा, असं आवाहन त्यांनी केलं. मोदी सरकारच्या एनआरसीला आपल्याला संघर्षानं उत्तर द्यावे लागले, असं आंबेडकर यांनी म्हटलं.
त्यावेळी त्यांनी आरोप केला की, आपण या देशाचे नागरिक आहोत, हे सिद्ध करण्यासाठी सरकार आपल्याकडे कागदपत्रं मागणार आहे. आपल्या आजोबा-पणजोबांची माहिती मागितली जाणार आहे. इतकी जुनी माहिती आम्ही कुठून देणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देशात अराजकता माजवण्यासाठी एनआरसीचा घाट घातला जात आहे. देशातील काहींचा मताधिकार सरकारला काढून घ्यायचा आहे. त्यासाठी सरकारला त्यांचं नागरिकत्व रद्द करायचं आहे. यामुळेच सरकारला एनआरसी लागू करायचा आहे.