पुणे : बहुजननामा ऑनलाइन : ‘राष्ट्रवादी हा संधीसाधू पक्ष आहे, राष्ट्रवादीतील नेत्यांना आपण भाजपमध्ये गेल्यावर निवडणुक जिंकू , असं वाटत असल्याने ते भाजपमध्ये जात आहे. मात्र राष्ट्रवादीवाले असेच जर जात राहिले तर, भाजप हा चोरांचा पक्ष बनण्याची भीती आहे असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. आंबेडकर यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल सुरु केला आहे. महाआघाडीत जर राष्ट्रवादी पक्ष असेल तर आम्ही त्यात समाविष्ठ होणार नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला स्पष्ठ सांगितले आहे. त्यांनी काँग्रेसला ऑफर दिली आहे. आणखी काही दिवस वाट पाहू आणि निर्णय घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं.
तसेच, यावेळी आंबेडकर यांनी भाजपवरदेखील निशाणा साधला म्हणाले कि, ‘ आरक्षणावर चर्चा करू असं मोहन भागवत म्हणतात तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आरक्षण नको, असेच दिसून येते. त्यामुळे पुन्हा भाजपच्या हातात जर सत्ता गेली तर ते आरक्षण रद्द करतील म्हणून भाजप ला हरवलं पाहिजे. ईडी चौकशी किंवा राज्य बँक प्रकरणी गुन्हे हा केवळ नाटकी आहे , त्यामुळे कुणालाही अटक होणार नाही.’ त्यावर आता अण्णा हजारे झोपले आहेत अशी टीकाही त्यांनी केली.
वंचित आघाडी काँग्रेस सोबत येण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिल्लीत झालेल्या छाननी बैठकीत बोलताना ही कबुली दिली. त्यामुळे महाराष्ट्रात आधीच अडचणीत असलेल्या काँग्रेसला आणखी धक्का बसणार आहे. सुरुवातीला छाननी समितीत वडेट्टीवार यांच्या नावाचा समावेश नव्हता. यासंदर्भात त्यांनी नाराजी व्यक्त करताच दिल्लीतून सूत्र हलली आणि त्यांचं नाव समाविष्ट करण्यात आलं होतं. मध्य प्रदेश काँग्रसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. आजच्या बैठकीत राज्यातल्या सर्व २८८ मतदार संघाचा आढावा घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात असलेल्या वॉर रुममध्ये या छाननी समितीची ही पहिलीच बैठक होती. या समितीची दुसरी बैठक आता ५ सप्टेंबर रोजी होणार आहे.
वडेट्टीवार म्हणाले कि, काँग्रेसला वंचितशी आघाडी करायची आहे मात्र त्यांनी घातलेल्या अटींमुळे आघाडी करणं अशक्यच आहे. आंबेडकरांच्या बोलण्यामुळे त्यांना काँग्रेससोबत आघाडी करण्याची इच्छाच नाही अशी टीकाही त्यांनी केली. वडेट्टीवार पुढे म्हणाले, कडूलिंबामध्ये कितीही साखर टाकली तर गोड होत नाही तसा प्रकार वंचित बहुजन आघाडीचा आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आम्ही वारंवार गेलो पण ते बोलायला तयार नाहीत. कधी म्हणतात राष्ट्रीय स्वयंसववक संघा संदर्भात भूमिका जाहीर करा, कधी म्हणतात चाळीस जागा घ्या, तर कधी म्हणतात राष्ट्रवादी सोबत आघाडी तोडा हे कसं चालणार ? राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा घटक पक्ष आहे त्यामुळे त्याला सोडणं कठीण आहे. संघाबद्दल तर आम्हीच स्पष्टच म्हटले होते की त्यांनी पत्रक तयार करावे आम्ही स्वाक्षरी करण्यास तयार आहोत.