सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन – जालना, औरंगाबादपासून ते बीड व नगरनंतर सोलापूर जिल्हातील करमाळा तालुक्यात गेले अनेक दिवस दहशत माजवणाऱ्या बिबट्याला शुक्रवारी सायंकाळी वनविभागाचे उपवनसंरक्षक धवलसिंह मोहिते-पाटील यांनी गोळ्या घालून ठार मारले. या बिबट्यानेच १२ जणांचे बळी घेतले असून, हा बिबट्या नरभक्षक कसा झाला, याचा तपास सुरु असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.
वार्ताहरांना बोलताना पाटील म्हणाले, वांगी गावाच्या शिवारात राखुंडे वस्तीवर ठार केलेल्या बिबट्यानेच १२ जणांचे प्राण घेतले. मृत बिबट्यास करमाळा मार्गे सोलापुरात आणेल असून, सोलापुरात त्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने पोस्टमॉर्टेम केले. पूर्ण वाढ झालेला हा नर बिबट्या नरभक्षक का झाला याचा शोध सुरु आहे. जुन्नर, नगर, पुणे करमाळा व माढा भागात बिबट्यासोबत वन्य प्राण्यांचा अधिवास आहे. या वन्य प्राण्यांपासून नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे. कुठेही प्राण्यांच्या हल्ल्यात जनावरे मृत्यू झाल्यास वन विभागास कळवण्यात यावे.
उजनी धरण परिसर व जंगल भाग असलेल्या परिसरात अजूनही वन्य प्राणी वावरत असण्याची शक्यता आहे. यामुळे पुणे, नगर व सोलापुरातील परिसरात यापुढे उपवनसंरक्षकांच्या माध्यमातून गस्त सुरु राहील, असेही धवलसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितलं.