मुंबई बहुजननामा ऑनलाईन – मार्च महिन्यात राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केली होती. त्यामुळे बेरोजगारांना दिलासा मिळाला होता. परंतु आता चार महिन्यांनंतरही भरती प्रक्रियेची गाडी पुढे सरकली नाही. मात्र आत ती या मेगा भरती प्रक्रियेला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. कारण आहे आचारसंहिता. येत्या काळात लागणारी विधानसभा आणि विधानपरिषदेची निवडणूक यात अडथळा ठरण्याची दाट शक्यता आहे.
जालना विधानपरिषदेच्या निवडणूकीची आचारसंहिता १९ जूलै रोजी लागू झाली आहे. ती २६ ऑगस्टपर्यंत म्हणजे निवडणूक संपेपर्यंत असेल. तर त्यानंतर लागलीच विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे ही मेगाभरती आचारसंहितेत अडकण्याची दाट शक्यता आहे.
राज्यात वेगवेगळ्या पदांसाठी १६ एप्रिलपर्यंत अर्ज भऱण्याची मुदत दिली होती. त्यानंतर आलेल्या तांत्रिक अडचणीनंतर मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाली होती. या काळातही हजारो तरुणांना मुदतवाढ दिली गेली. परंतु लोकसभा निवडणूकीनंतर ही भरती प्रक्रिया सुरु होण्याची अपेक्षा होती. मात्र शासनाकडून अद्याप तरी कोणत्याही जिल्हा प्रशासनाला याबाबत कोणतेही निर्देश दिले नाहीत. त्यासोबतच कोणत्याही सुचना त्यांच्याकडून मागविण्यात आलेल्या नाहीत.
या मेगा भरतीमध्ये राज्यातील स्थापत्य अभियंता, कनिष्ठ अभियंता, ग्रामसेवक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विस्तार अधिकारी, लेखाधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य सेवक, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक, आदी पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र या परीक्षेनंतर आता औरंगाबाद जालना विधान परिषदेची आचारसंहिता २६ ऑगस्ट पर्यंत राबविली जाणार आहे. तर ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूका आणि सप्टेंबरमध्ये विधानसभेची आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे बेरोजगारांना आता आणखी तीन चार महिने प्रतिक्षाच करावी लागणार आहे.