बहुजननामा ऑनलाईन टीम – मोटार व्हेईकल संशोधन बिल लोकसभेत एकमताने मंजूर करण्यात आले आहे. तसेच विधेयकात सुचवण्यात आलेल्या सर्वच बदलांना मंजूर करण्यात आले आहे. या सर्व बदलांना विरोधकांनी पाठिंबा दर्शवला आहे मात्र राज्यांची शक्ती आणि अधिकार कमी करण्याच्या निर्णयाला विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. या विधेयकाद्वारे केंद्र सरकार सर्व अधिकार स्वतःकडे ठेवत असल्याची टीका यावेळी त्यांनी केली.
अँब्युलन्ससाठी विशेष नियम करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सभागृहात दिली. अँब्युलन्सला जाण्यासाठी मार्ग न दिल्यास त्यांच्यावर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात येईल. जर टोल नाक्यांवर किंवा ट्राफिक मध्ये गाडी थांबल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार नाही.
अल्पवयीन मुलांकडून अपघात झाल्यास आईवडिलांना शिक्षा
या विधेयकावर बोलताना गडकरी म्हणाले कि, अल्पवयीन मुलांनी अपघात केला असेल तर त्यांच्या पालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. कारण अल्पवयीन मुलांना शिक्षा करता येत नसल्याने पालकांवर कारवाई केली जाणार आहे. यापुढे आता लहान मुलांच्या हाती गाडी देण्याअगोदर विचार करावा लागणार आहे. अपघात रोखण्यासाठी तामिळनाडू सरकारने केंद्र सरकारपेक्षा उत्तम पावले उचलले असल्याने या मॉडेलवर केंद्र देखील काम करणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. देशातील ४० टक्के अपघात हे राष्ट्रीय महामार्गांवर होत असल्याने आता केंद्र सरकार यावर उपाय करणार आहे.
आमच्याकडे पैसे नाही, विदेशी गुंतवणुकीची गरज
इलेक्ट्रिक वाहनांबद्दल बोलताना गडकरी म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहने डिझेलच्या तुलनेत स्वस्त असतात. म्हणून अशा वाहनांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. यावेळी दिल्ली, हिमाचल, महाराष्ट्र या राज्यांमध्ये एसी बसेस खरेदी करण्याचा विचार सुरु असल्याची ही माहिती त्यांनी सभागृहात दिली. त्याचबरोबर उर्वरित कामांसाठी माझ्या विभागाकडे आता पैसे नसून विदेशी गुंतवणुकीची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.