नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावरून विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. काही राजकीय पक्ष आपली ठराविक वोटबँक वाचवण्यासाठी CAA आणि NRC बाबत अफवा पसरवत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी यावेळी केला. काँग्रेस पासून ते पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला. हे विधेयक पारित झाल्यानंतर विरोधक जनतेला भ्रमित करत आहेत. खोटं बोलत आहेत. जेव्हा दिल्लीतील कच्ची घरं आम्ही पक्की केली तेव्हा आम्ही कोणी कुठल्या धर्माचे आहे हे विचारले होते का ? काही पुरावे मागितले होते का ? असा सवाल करत नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच यावेळी पंतप्रधानांनी उद्धव ठाकरे यांच्यासह इतर मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे.
जे मुख्यमंत्री म्हणतात हा कायदा लागू करणार नाही, त्यांनी आपल्या मुख्य महाधिवक्त्यासोबत थोडी चर्चा करा. राज्य असे करू शकते की नाही हे विचारा. मुख्यमंत्री असं बोलून स्वतःचे हसे करून घेत आहेत, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांना फटकारलं आहे.
काँग्रेसवर घणाघात
‘हिंसाचाराला काँग्रेसची मुक संमती आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर आतापर्यंत 35 हजार पोलीस शहीद झाले आहे. देशातील हिंदू किंवा मुस्लीम लोकांसाठी हा कायदा नाही. काँग्रेस आणि अर्बन नक्षलवादी लोकांना फसवण्यासाठी खोटे बोलत आहेत,’ असा घणाघाती आरोपही नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
ज्यावेळी काँग्रेसचे दिल्लीमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार होते त्यावेळी त्यांनी येथील वसाहतींचा प्रश्न का मार्गी लावला नाही असा सवाल मोदींनी यावेळी उपस्थित केला.काँग्रेसवाल्यानी दिल्लीतील अनेक महत्वाच्या परिसरातील बंगले आपल्या जवळच्यांना दिले होते. मात्र तुमच्या घराचा विचार केला नव्हता अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरात अनेक मोठे मोठे आंदोलन केले जात आहेत. जाळपोळ केली जात आहे मात्र याबाबतचा राग काढायचा असल्यास तो मोदींवर काढा, पुतळा जाळायचा असल्यास तो मोदींचा जाळा परंतु गरीबाची झोपडी आणि वाहने जाळू नका असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.
Visit : bahujannama.com