मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा सनसनाटी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान आता या प्रकरणात सक्तवसुली संचालनालय (ईडी) लक्ष घालण्याची शक्यता आहे. यातील आर्थिक कनेक्शन त्याच्याकडून तपासले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गृहमंत्री देशमुख आणि ठाकरे सरकारच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
परमबीर सिंगांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात वाझेंना 100 कोटी हप्ता वसुलीचे टार्गेट दिले होते, असे नमूद केले आहे. आता हेच पत्र सिंग यांनी सोमवारी (दि. 22) राज्यपालांनाही देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यामागील आर्थिक कनेक्शन तपासण्यासाठी हे प्रकरण ईडीकडे पाठवले जाऊ शकते. तसेच आरोपांचे गांभीर्य समजून ईडी स्वतः देखील हे तपास करू शकते. परमबीर यांचा जबाब नोंदवून त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. तसेच विरोधी पक्षाकडून तक्रार नोंदवली गेल्यास ईडीकडूनही हे प्रकरण हाताळले जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.