मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पटकथा लेखक, संवाद लेखक आणि दिग्दर्शक सागर सरहदी (वय ८७) यांचे रविवारी रात्री उशिरा दीर्घ आजाराने निधन झाले. मुंबईतील सायन परिसरातील आपल्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी खाणे पिणे सोडले होते. सोमवारी सकाळी १२ वाजता सागर सरहदी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
‘कभी कभी’, ‘चांदनी’ आणि ‘सिलसिला’ अशा सुपरहिट चित्रपटाचे पटकथा लेखक, संवाद लेखक म्हणून त्यांची ओळख होती.
सागर सरहदी यांचा जन्म पाकिस्तानातील अबोटाबाद येथे ११ मे १९३३ मध्ये झाला होता. फाळणीनंतर ते भारतात प्रथम दिल्ली येथे आले होते. सागर यांनी सुरुवातीला उर्दू कथा लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर उर्दू नाटककार म्हणूनही सुरु ठेवले. त्यांना अनेक फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार मिळाले होते. तसेच फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट कथा पुरस्कार, फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कारासाठी त्यांचे नामांकने झाली होती.
यश चोप्रा यांच्या ‘कभी कभी’ या अमिताभ बच्चन, रेखा यांच्या चित्रपटामुळे खर्या अर्थाने लोकप्रियता मिळाली होती. नुरी, फासले, रंग, अनुभव, जिंदगी, कहो ना प्यार है, कारोबार, बाजार अशा अनेक चित्रपटाच्या पटकथा, संवाद लेखन सागर यांनी केले होते.