मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – माजी आयुक्त प्रवम्बीर सिंग यांनी केलेल्या आरोपामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या शिफारशींमुळेच वाझेला पोलीस दलात घेण्यात आले होते असा आरोप करण्यात येत होता. यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, आता एक नवी माहिती समोर आली आहे. एपीआय सचिन वाझेची मुंबई पोलीस दलात पुन्हा एंट्री परमबीर सिंग यांच्यामुळेच झाली असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी ५ जूनला सिंग यांच्या अध्यक्षतेखाली निलंबन आढावा समितीने हा निर्णय घेतला. त्यानंतर ३ दिवसांनी वाझे मुंबई पोलीस दलात रुजू झाले असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे.
शिवसेनेच्या आग्रहावरून वाझेला खात्यात घेतल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व विरोधकांनी केला आहे. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे. कागदोपत्री तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांच्या अधिकारात हा निर्णय झाला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम(४),(५),(क)च्या अनुषंगाने त्याला सेवेत घेण्यात आले होते.
१३ मार्चला मध्यरात्री एपीआय सचिन वाझेला अँटेलियाच्या परिसरात मिळालेल्या स्फोटक कारच्या गुन्ह्यात एनआयएने अटक केली. त्यानंतर राज्यात सातत्याने नवनवीन माहिती समोर येत असल्याने राज्यातील वातारण चांगलेच तापले आहे. गृहमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. विरोधकांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दुसरीकडे देशमुख यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. परमबीर यांच्याशी पूर्वीपासून वाझे व एसएस ब्रँचचे एसीपी पाटील हे संबंधित असल्याचा दावा केला. त्याचबरोबर वाझेला पुन्हा सेवेत घेण्यामागील माहिती घेतली असता त्यातून अनेक बाबी समोर आल्या आहेत. ३ मार्च २००४ रोजी ख्वाजा युनूस प्रकरणी वाझेला अटक झाली होती. त्यानंतर त्याच वर्षी १२ मार्चला त्याला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल १६ वर्षे खात्याबाहेर होता. आयुक्त परमबीर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ५ जून २०२० रोजी निलंबन आढावा समितीच्या बैठकीत त्याला पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय झाला. या बैठकीत आयुक्ताशिवाय सहआयुक्त (प्रशासन), सशस्त्र दलाचे अप्पर आयुक्त, एसीबीचे अप्पर आयुक्त व मंत्रालय सुरक्षा उपायुक्त उपस्थित होते. बैठकीत ११३ प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी १८ जणांचे निलंबन मागे घेण्यात आले.
हिरेन हत्या प्रकरणाचा तपास आज एनआयए ताब्यात घेणार
अँटिलियाच्या स्फोटक कार प्रकरणाच्या तपासापाठोपाठ आता व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास एटीएसकडून राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग करण्याचा केंद्रीय गृहविभागाने घेतला आहे. त्यासंदर्भात राज्य सरकारला आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे राज्यसरकारकडून तसा आदेश मिळाला नसल्याने या प्रकरणाचा तपास अद्यापही एटीएसकडे आहे. या संदर्भात आज आदेश जारी केले जातील असे सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान एटीएसला या हत्येचा उलगडा करण्यात यश आले आहे. साची वाझे हाच या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी एक निलंबित कॉन्स्टेबलसह बुकीला अटक केली आहे. एटीएसने तपासासाठी वाझेचा एनआयएकडून ताबा मिळवण्यासाठी मागणी केली आहे. त्याच वेळी या प्रकरणाचा तपास एनआयकडे वर्ग करण्याचा निर्णय केंद्रीय गृहविभागाने घेतला आहे.
हिरेनच्या वकिलाकडील चौकशीमुळे वाझेविरुद्ध पुराव्याला बळ
एनआयएच्या पथकाने मनसुख हिरेन याचे वकील के.एच. गिरवी यांच्याकडे चौकशी केली.
चौकशीतून अनेक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. हि माहिती वाझेविरुद्ध आरोपाला पूरक अशी आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्धचे पुरावे भक्कम झाले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. शनिवारी गिरवी यांच्याकडे सुमारे चार तास चौकशी केली. पोलिसांकडून होत असलेल्या त्रासाबाबत हिरेन यांना वाझेनेच पत्र लिहून दिले होते, असे त्यांनी सांगितले असल्याचे समजते. ६ महिन्यांपासून वाझेला ओळखत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.