अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. समाजाला प्रगतीच्या दिशेने जायचे असल्यास परिवर्तन हे आवश्यक आहे. असेच परिवर्तन अंजनगाव सुर्जी शहरातील जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी घडवून आणले असून हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात सुवासिनीसह विधवा महिलांनाही सन्मानाचे स्थान देऊन ओटी भरुण त्यांच्या आयुष्यात नवचैतन्य आणण्याचा प्रयत्न जिजाऊ ब्रिगेडने गणेश नगर येथे केला.
अमरावती जिल्ह्यात व.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडागे महाराज, शिक्षणमहर्षी पंजाबराव देशमुख यांनी आपल्या परिवर्तनवादी विचारांनी येथील मनामनात स्थान निर्माण केले. त्यांचाच विचार डोळ्यासमोर ठेवून सर्व रुढी परंपरांना झुगारून जिजाऊब्रिगेडच्या महिलांनी हा उपक्रम पार पाडला. यात चार प्रकारचे परिवर्तन करण्यात आले. पहिले परिवर्तन म्हणजे अमावस्येनंतर हळदीकुंकू करता येत नाही, परंतु जिजाऊ ब्रिगेडनी ही निरर्थक प्रथा मोडून सर्वांच्या सोयीनुसार हा कार्यक्रम आयोजित केला.
दुसरे परिवर्तन म्हणजे धान्याची नासाडी होऊ नये म्हणून फूलांनी ओटी भरण्यात आली. तिसरे परिवर्तन म्हणजे निरुपयोगी वस्तूचे वाण न देता महापुरुषांचे पुस्तके वाणस्वरूपात देण्यात आले. चौथे आणि सर्वात क्रांतिकारी परिवर्तन म्हणजे विधवा महिलांनाही सुवासीनीएवढाच सन्मान देऊन हळदीकुंकू लावून त्यांची ओटी भरण्यात आली. हा उपक्रम राबवून जिजाऊ ब्रिगेडच्या सारिका मानकर, स्वाती मानकर, पल्लवी आढाऊ, जयश्री रेचे, वर्षा सावरकर, सीमा बोके, शीतल बोके तसेच सर्व जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी समाजासमोर नवीन आदर्श निर्माण केला.