नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – व्हॅलेंटाईन डे, दहशतवाद, देश विघातक कृत्य याबाबत सतर्कता बाळगण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. व्हॅलेंटाईन डे च्या नावाखाली होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी शाळा-महाविद्यालयात ‘ मातृ – पितृ ‘ दिवस साजरा करण्याचे आवाहन हिंदू जनजागृती समितीकडून करण्यात आले असून यासाठी प्राचार्यांची बैठक घ्यावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. तसेच त्या दिवशी पोलिसांचे विशेष पथक नेमावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी देशात हिंसक कृत्य करण्याच्या तयारीत असलेल्या मुंबई व औरंगाबाद या शहरांतून दहशतवाद विरोधी पथकाने ९ लोकांना पकडले आहे. हे सर्व १७ ते ३५ वयोगटातील तरुण असून मुख्य आरोपीला मदरशामधून ताब्यात घेण्यात आले. बर्मामाइन्स (जमशेदपूर) येथील हिंदूचे भयाने पलायन, कर्नाटक व मध्यप्रदेश येथे सत्ता परिवर्तन होताच काही दिवसात हिंदू नेत्यांच्या हत्या करण्यात आल्या, मध्यप्रदेशात मागील महिन्यात केवळ दोनच दिवसात चार हिंदूत्वनिष्टांच्या हत्या करण्यात आल्या. यापूर्वीही असे प्रकार सुरु होते. या प्रकरणात राज्य शासन अन्वेषण करण्यात अपयशी ठरलेले असल्यामुळे या आक्रमणाबाबतच्या चौकशीसाठी सीबीआयची नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांना देण्यात आले. या वेळी श्रीराम जन्मोत्सव समितीचे गणेशसिंग ठाकूर, कृष्णा मद्रेवार, माणिकराव भराडे, नागेश बुंदेल, गणेश जाधव, नवीन परमार, रामराव वाघमारे, संदीप गोजे, गौरव वाळिंबे, गिरीश रघुजीवार तसेच हिंदू जनजागृती समितीचे उदय बडगुजर, मनोहर देशपांडे आदी उपस्थित होते.