मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात मॉब लिंचिंगविरोधात कायदा आणावा अशी मागणी कॉंग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत केली. या मागणीला सर्व विरोधकांनी पाठिंबा दिला आहे. तर काही सत्ताधारी आमदारांनी या मागणीला विरोध दर्शवला.
त्यासोबतच उत्तर प्रदेशातील भाजप अध्यक्षा सुनिता सिंग यांनी मुस्लीम समाजातील महिलांवर सामूहिक बलात्कार केला पाहिजे असं खळबळजनक विधान केलं होते. हा मुद्दादेखील त्यांनी उपस्थित केला. भाजपच्या महिला मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्य महिला अध्यक्षा विजया रहाटकर यांनी कारवाई करावी. त्यांनी याबाबत केवळ ट्विट केलं आहे. महिला आयोगाने नुसतं ट्विट करू नये तर कारवाई करण्याचे धाडस दाखवावं अस आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
राज्यात मॉब लिंचिंगविरोधी कायदा असावा अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केल्यानंतर त्याला विरोधी पक्षातील सर्व नेत्यांनी पाठींबा दिला. त्यावेळी एमआय़एमचे आमदार वारीस पठाण यांनी मुंब्रा परिसरातील घटनेचा उल्लेख केला. एका मुस्लीम वाहनचालक तरुणाला जय श्री राम बोलण्यास लावून त्याला जय श्री राम बोलण्याची सक्ती करून मारहाण करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी कायदा करण्याची मागणी केली.त्यासोबतच कॉंग्रेस आमदार नसीम खान यांनी मॉब लिंचिंगविरोधात कायद्यासोबत दोषींना १० वर्षांची शिक्षा आणि मोठ्या दंडाची रक्कम अशी तरतुद करावी अशी मागणी केली.
तर विरोधकांच्या या मागणीला सत्ताधारी आमदारांपैकी राज पुरोहित, मनिषा चौधरी, प्रयाग आळवणी यांनी विरोध केला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक वेलमध्ये समोरासमोर आले होते.