औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – औरंगाबादच्या महाएक्सपो कार्यक्रमात युवकांशी रोहित पवार आणि भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे संवाद साधत असताना रोहित पवार यांनी जबरदस्त विधान केले आहे. ते म्हणाले ‘पवार’ कधी कोणाला कळाले नाही आणि कळणार देखील नाही. एकत्रित काम करणे म्हणजेच पवार आणि ते तसेच शेवटपर्यंत एकत्रच राहतील. तसेच युवकांनी नोकरी शिवाय रोजगाराकडेही लक्ष केंद्रीत करावे, असा सल्लाही दिला.
एकीकडे बारामतीत अजित पवार यांच मोठ्या आनंदाने स्वागत होत असताना पवार कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित नसल्यामुळे त्यावर रोहित यांना प्रश्न विचारला. त्यावर स्पष्टीकरण देत ‘रिकाम्या लोकांना काही काम नसतात. तीच लोक चर्चा सुरू करतात. तो कार्यक्रम पूर्वनियोजित नव्हता. त्यावेळी मी माझ्या मतदार संघात नागरिकांशी चर्चा करत होतो. त्यावेळी दादांनीच जनतेची काम महत्त्वाची असतात. सत्कार हा वैयक्तिक आहे. त्यामुळे तू तुझं काम कर, असं म्हणल्याने मी गेलो नाही,’ असे रोहित यांनी सांगितले.
तसेच सारथीबाबतही रोहित पवार बोलले. सारथी सुरु करायला काही अडचणी आहेत. दोन अधिकाऱ्यांमधील वाद म्हणा किंवा काही तांत्रिक अडचणीत आहेत. त्या दूर झाल्या पाहिजे. पाठपुरावा करण्यासाठी सुप्रियाताई सोबत असतीलच. बार्टी, ज्योती आणि सारथी सारख्या योजनांचा फायदा गोरगरीब मुलांना झाला पाहिजे. राजे उपोषणाला बसले असून त्यांच्या उपोषणाची सरकार गंभीर दखल घेईल. सारथी सुरु होईल, अशी अपेक्षा रोहित यांनी व्यक्त केला.
शेतकरी आत्महत्या करण्यामागे वेगवेगळी कारणे असतात. त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. शासकीय योजना कमी पडत असण्याचे देखील कारण असू शकते. तसेच आत्महत्या होऊ नयेत म्हणून सरकार योग्य निर्णय घेईल, असे रोहित पवार म्हणाले. आजची शिक्षण पद्धती बदलून प्रात्यक्षिक अभ्यासक्रम सुरु केला तर त्याचा फायदा पुढच्या पिढीला होईल. याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना भेटून काही बदल करता आले तर करा, अशी विनंती करणार असल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले.