बहुजननामा ऑनलाईन – सिंचन घोट्याळ्यात नेमके काय झाले? याच सत्य बाहेर आलंच पाहिजे. त्याला कोण जबाबदार आहे, कोण नाही याबद्दल आम्हाला काहीही घेणंदेणं नाही. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात सिंचनावर पैसे खर्च होऊनही जर सिंचन वाढलेले नसेल, तर पाणी नेमके कुठे मुरत आहे? पैसे कुठेतरी मुरलेला आहे. म्हणूनच हे सत्य जनतेला कळालेच पाहिजे. तो पैसे शेवटी कर भरणाऱ्यांचा असून ते कळणे जनतेचा अधिकार आहे. असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी माध्यमांसमोर सांगितले.
पुढे राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरही भाष्य केले. आज मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. सिंचनाचा अभाव हेही कारण त्यांच्या आत्महत्येमागे असू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न असून तो प्रश्न फक्त राजकीय राहू नये. या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन सत्य बाहेर काढले पाहिजे. तसेच भ्रष्टाचार आहे तोही बाहेर आला पाहिजे, असे राजू शेट्टी म्हणाले.
तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोलतांना कर्जमाफीचे निकष बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या जी काही दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली असून त्याला जे काही निकष लावले आहेत. त्या निकषांमध्ये सहा ते सात हजार कोटींच्यावर रक्कम जात नाही. एकतर आकडा चुकीचा असू शकतो. नाहीतर तुमच्याकडे ३१ हजार कोटी खर्च करण्याची तयारी असेल. त्यामुळे हे निकष बदलावे लागतील, असे राजू शेट्टी म्हणाले.