चंदीगड : वृत्तसंस्था – पंजाबचे मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या ट्विटरवर त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे. विशेष म्हणजे एक महिन्यापुर्वीच त्यांनी आपले राजीनामा पत्र राहुल गांधी यांच्याकडे दिले होते. ते पत्र देखील त्यांनी ट्विटरवरुन शेअर केले आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नव्हते. पंजाबमध्ये सिद्धू यांच्यामुळे पक्षाला कमी जागा मिळाल्याचा आरोप मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केला होता. तसेच त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. अमरिंदर सिंग यांनी सिद्धू यांच्याकडे असणाऱ्या खाते नागरी प्रशासनाचे खाते बदलून त्यांच्याकडे ऊर्जा खाते दिले होते. त्यांनी याच मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
तब्बल एक महिन्यापुर्वी आपल्याकडील खाते बदलल्याने सिद्धू यांनी राहुल गांधी व प्रियांका यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली होती. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील मतभेद लोकसभा निवडणुकी पुर्वी देखीस समोर आले होते. लोकसभा निवडणुकीनंतर पंजाब राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीला हजर न राहता सिद्धूंनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अमरिंदर सिंग यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. सिद्धू यांना संयम ठेवण्याचे देखील पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात आले होते. मात्र आता एका महिन्यानंतर सिद्धू यांनी आपला राजीनामा सार्वजनिक करत मंत्रीमंडळात राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.