मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. मुंबईत दररोज लाखो टन कचरा तयार होतो आहे. या कचऱ्याच्या समस्येतून सुटण्यासाठी मुंबई महापालिकेन अनोखी शक्कल लढवली आहे. जेवढा कचरा निर्माण कराल तेवढ्या पटीत पालिकेला कर भरावा लागणार असल्याची योजना पालिकेने तयार केली आहे. त्यामुळे पालिकेच्या महसुलातदेखील भर पडणार आहे.
मुंबई महापालिकेकडून कचऱ्यावर कर आकारला जात नव्हता. त्यामुळे स्वच्छ सर्व्हेक्षणात त्यांचे मानांकन घसरले होते. त्यामुळे देखील कचऱ्यावर कर लावण्याचा विचार पालिककडून करण्यात येत होता.
सोसायटी किंवा आस्थापनापासून कचरा उचलून, वाहून नेण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिका आता नागरिकांकडून कर वसूल करणार हे निश्चीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र कचऱ्यावर कर लावण्याचा प्रस्ताव लवकरच गटनेत्यांपुढे मांडण्यात येणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी पालिकेने या आधी १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायटय़ांना आपल्याच आवारात ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सक्ती केली होती. त्याचा पुढचा भाग म्हणून आता कचऱ्यावर कर लावण्यात येणार आहे. गटनेत्यांच्या बैठकीत या योजनेला मंजुरी मिळाली तर रहिवासी आणि व्यापारी यांना येत्या काळात दरमहा हा कर भरावा लागणार आहे. या कचऱ्याचे दरही ठरवण्यात आले असून दर महिना १०० किलो कचरा निर्माण करणाऱ्या सोसायटय़ांना ६० रुपये भरावे लागणार आहेत. तर दुकाने व आस्थापनांसाठी हा दर ९० रुपये असणार आहे.