बहुजननामा ऑनलाइन टीम – एकलहरे ग्रामपंचायतीच्या सरपंच मोहिनी संदीप जाधव यांना सरपंचपदासाठी अपात्र ठरविल्या आहेत. अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्याकडे झालेल्या तक्रारीच्या सुनावणीत (Sarpanch post canceled)हा निर्णय झालाय.
मोहिनी जाधव यांच्या कुटुंबाने शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले असल्याने त्यांना अपात्र ठरवावे, यासाठी मोहन विठ्ठल लिंबोळे यांनी अपर जिल्हाधिकार्यांकडे हरकत घेतली होती. मोहिनी जाधव एकलहरे ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आल्या आहेत.
2017 पासून 2022 पर्यंत सरपंचपदी त्यांची निवड झालीय. त्यांच्या सासर्यांनी एकलहरे परिसरातील गोदावरी कालव्यावर अतिक्रमण करून वसविलेल्या सिद्धार्थनगर या येथे शासकीय जागेवर अतिक्रमण करून घर बांधले आहे. त्यांच्या पतीचा याच जागेवर व्यवसाय आहे. त्यामुळे जाधव कुटुंबाचे शासकीय जागेवरील अतिक्रमण असल्याने त्यांना अपात्र ठरविण्याच्या मागणीसाठी लिंबोळे यांनी तक्रार केली होती.
याबाबत एकलहरेच्या सरपंच मोहिनी जाधव म्हणाल्या, जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेला निकाल धक्कादायक असून गावातील भ्रष्ट रेशन दुकानावर कठोर कारवाईसाठी सतत पाठपुरावा केल्याने माझ्याविरुद्ध राजकीय षडयंत्र रचून खोटी तक्रार दाखल केलीय. पाटबंधारे विभागाने अतिक्रमण नसल्याबाबतचा स्पष्ट अहवाल देऊन देखील निकाल माझ्याविरोधात देऊन माझ्यावर अन्याय केलाय. या झालेल्या निर्णयाच्या विरोधात वरिष्ठ कार्यालयाकडे दाद मागणार आहे.