मुंबई : बहुजनामा ऑनलाइन – शिवसेनेच्यावतीने बुधवारी (17 जुलै) पीकविमा कंपन्यांविरोधात इशारा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा शेतकऱ्यांसाठी मोर्चा असेल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मात्र हा मोर्चा म्हणजे निव्वळ नौटंकी असल्याची टिका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री सहभागी होत असतात. मंत्रीमंडळात ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत नाहीत मात्र बाहेर येऊन आंदोलनाची भाषा करतात. सत्तेत सहभागी असणाऱ्या पक्षाने जनतेचे प्रश्न सोडवायचे असतात. प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेश देऊन अंमलबजावणी करुन घ्यायची असते. मात्र सरकरामध्ये शिवसेनेचे काहीच चालत नसल्याने त्यांना विरोधी पक्षासारखे आंदोलन करण्याची वेळ आली आहे. शिवसेनेला खरच शेतकऱ्यांची काळजी असेल तर त्यांनी सरकारी पातळीवरुन पीक विमा कंपन्यांचा बंदोबस्त केला असता, असा टोला ही वडेट्टीवार यांनी लगावला. तसेच राज्याच्या सत्तेत सहभागी असतानाही शिवसेनेला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता आले नसल्याचा आरोप ही केला.
शिवसेनेला कोणीही गांभीर्याने घेत नाही. सरकारच्या आशीर्वादानेच मागील पाच वर्षात पीक विमा कंपन्या मालामाल झाल्या आहेत. त्यांनी शेतकऱ्यांची पिळवणुक करुन कंगाल केले. मागील पाच वर्षापासून पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांची लुट होत असताना शिवसेना काय करत होती, असा सवाल देखील वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच शिवसेनेच्या या नौटंकीला शेतकरी आता भीक घालणार नसल्याचे म्हटले आहे.