मुंबई बहुजननामा ऑनलाईन- चेंबुर येथील पंचशिल नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यात येईल. त्याचबरोबर रहिवाशांच्या मागणीनुसार बुद्धविहार तसेच येथील उर्वरित पात्र रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यात येईल, असे आश्वासन गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील, मंगेश कुडाळकर यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती. लक्षवेधीच्या वेळी उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर बोलत होते. यावेळी त्यांनी या झोपडपट्टी पुनर्वस योजनते ९३३ झोपड्यांचा अंतर्भाव होता. यात ६५९ निवासी, वाणिज्य/दुकाने ३८, संयुक्त ५ व धार्मिक स्थळे २ अशा एकूण ७०३ झोपडया पात्र आहेत. व २१८ अपात्र आणि १२ अनिर्णीत आहेत. विकासकांनी अद्याप फक्त ५६० पात्र रहिवाशांना घरे दिली असून अद्याप १४३ सदनिकांचे काम पूर्ण होणे बाकी असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.
आपण या प्रकल्पाला वैयक्तिकरीत्या भेट देणार का, तसेच या प्रकल्पात झालेल्या अनियमिततेची चौकशी करणार का आणि बुद्धविहाराला स्वतंत्र जागा देऊन बांधणार का असे प्रश्न विचारले.यावर उत्तर देताना राज्यमंत्री वायकर यांनी येथील उर्वरित पात्र रहिवाशांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी करण्यात येईल, तसेच बुद्धविहारही त्याच ठिकाणी बांधण्यात येईल, असे आश्वासन दिले.