मुंबई बहुजननामा ऑनलाईन – राज्यचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेच्या कामांतील कथित भ्रष्टाचाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी, असे निर्देश सभापती रामराजे नाइक निंबाळकर यांनी सोमवारी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिले. २४ जून रोजी राखून ठेवलेल्या प्रश्नावर झालेल्या चर्चेवेळी सभापतींनी हे निर्देश दिले.
राज्यात जलयुक्त शिवारच्या कामात गैरव्यवहार एकूण १३०० प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात सुमारे १३०० जलयुक्त शिवारची कामे आहेत. जिथे गैरव्यवहार झाला आहे. अशा ठिकाणी जिल्ह्याबाहेरच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून विभागीय चौकशी सुरु केल्याची माहिती जलसंधारण मंत्री तानाजी जाधव यांनी दिली होती.
२४ जून रोजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचाराची माहिती सभागृहात दिली होती. त्यावेळी संबंधित मंत्र्यांनी भ्रष्टाचार झाल्याची कबुलीही दिली होती. मात्र या प्रश्नावर सभागृहात गोंधळ निर्माण झाल्याने हा प्रश्न राखून ठेवण्यात आला होता.आज पुन्हा एकदा गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आला सभापती रामराजे निंबाळकर यांनी हस्तक्षेप करत लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले.