नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत आणि चीनमधील तणाव वाढतच आहे. चीनला धडा शिकवण्यासाठी भारताने चीनी अॅप्सवर बंदी घातली. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारतामध्ये चीनी मालावर बंदी घालण्याची मागणी वाढू लागली आहे. अशातच आता भारतीय इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आणि इलेक्ट्रॉनीक्स इंडस्ट्रीने चीनी कंपन्यांच्या ऑर्डर मोठ्या प्रमाणावर रद्द करण्यास सुरुवात केल्याचे एका मीडिया अहवालातून समोर आले आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, आता या ऑर्डर्ससाठी नवीन पर्याय शोधण्यात येत आहे. या कंपन्या मुख्यत्वे पॉवर डिस्ट्रिब्यूशन आणि ट्रान्समिशन गिअरच्या ऑर्डर्स रद्द करत आहेत. इतर देशांमध्ये याची किंमत जरी अधिक असली तरी त्या ठिकाणाहून या ऑर्डर्स मागवण्यात येणार असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केल्यानंतर यासंदर्भातील पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे.
या वस्तू चीनकडून मागवल्या जातात
मीडिया अहवालानुसार, इंडियन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष आरके चुघ यांनी माहिती देताना म्हटले आहे की, इंडस्ट्रीमध्ये कच्चा मालाव्यतिरिक्त सुद्धा इतर सामान चीनमधून मागवण्यात येत होते. IEEMA चे डायरेक्टर जनरल सुनील मिश्रा यांनी माहिती दिली की, इंडस्ट्री सध्या पर्याय शोधत आहे. जेणेकरुन चीनकडून होणारा हा पुरवठा थांबवण्यात येईल. जोपर्यंत आपण पूर्णपणे आत्मनिर्भर होत नाही तोपर्यंत या सामानाचा पुरवठा करणारे मित्र देश अर्थात जपान, तैवान, कोरिया आणि जर्मनीमधून त्याची मागणी केली जाणार आहे. सॉफ्टवेअरची आयात यूरोपमधून तर कच्च्या मालासाठी रशिया, चेक रिपब्लिक आणि पोलंडकडे मागणी केली जाऊ शकते.