मुंबई बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीची साथ दिल्यानंतर आता विधानसभा निवडणूकीत एमआयएमकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. वंचित बहुजन आघाडीने राज्यात एकला चलो रे चा नारा दिला आहे. त्यानंतर आता वंचितचा घटक असलेल्या एमआयएमने राज्यात विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकर यांच्याकडे १०० जागांची मागणी केली आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
लोकसभा निवडणूकीमध्ये वंचित आणि एमआयएमने राज्यात सोबत निवडणूक लढविली. राज्यात एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादची एक जागा राखली. त्यानंतर आता विधानसभा निवडणूकीच्या तयारील वंचितने जोरदार सुरुवात केली आहे. कॉंग्रेसची वाट न पाहता राज्यात आता वंचितने आपल्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वंचितचा घटक असलेल्या एमआयएमने विधानसभा निवडणूकीत प्राबल्य असलेल्या १०० जागांची यादी तयार केली आहे. एमआयएमने प्रकाश आंबेडकर यांच्याकडे १०० जागांची मागणी करत ही यादी त्यांच्याकडे सोपविली असल्याचे माहिती सुत्रांनी दिली आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदूद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या लवकच यासंदर्भात बैठक होणार असल्याचेही सुत्रांनी सांगितले.
यासंदर्भात बैठकीत प्रकाश आंबेडकर आणि असदूद्दीन ओवेसी यांच्यात चर्चा झाल्यानंतर नेमकं काय उत्तर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान वंचितने राज्यात सर्व २८८ जागा लढविणाऱ असल्याची घोषणा केली आहे. तर कॉंग्रेसला ४० जागा देण्याची घोषणा केली. कॉंग्रेसने अद्यापही वंचितशी बोलणी केलेली नाही. त्यामुळे नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.