नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत तळागाळातील लोकांना एकत्र करत वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते मिलिंद पखाले यांनी वंचित वर गंभीर आरोप केला आहे. ‘भाजपला निवडून आणण्यासाठीच वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्यात आली आहे, असा थेट आरोप ‘पखाले’ यांनी केला असून पूर्व विदर्भातील पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांसह भारिप सोडत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
वंचितचे प्रवक्ते मिलिंद पखाले यांनी काल (बुधवार) पत्रकार परिषद घेत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या एकूणच राजकारणावर टीका केली. ते म्हणाले, राज्यात काहीही ताकद नसताना लोकसभेच्या जवळपास सर्वच्या सर्व जागा (४७ जागी ) लढवून वंचित बहुजन आघाडीने RSS व भाजपला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे.
वंचित बहुजनांची तसेच आंबेडकरी जनतेची मते कुजवण्याचे काम यातून झाले आहे. तसेच वंचित हे नवे लेबलही आम्हाला मान्य नसल्याचे ते म्हणाले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, असा दावाही त्यांनी केला. यावेळी पत्रकारांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात गौतम वासनिक, विवेक वाकोडे, जोगेंद्र सरदारे, डॉ. जयप्रकाश धोंगडे, अरुण देठे, यशवंत म्हैसके, जगदीश फुलझेले, नरेंद्र ढोणे, दिनकर रामटेके, अजय खळसिंगे, अशोक खंडाळे, ज्ञानदेव इंदुरकर, अंबादास धोंगडे, ज्ञानेश्वर टेंभुर्णे आदी लोकांची नावे स्वाक्षरीसह होती. तर डॉ. बिंदुसार उके, शालिक नन्नावरे, अंगराज शेंडे, भारत थुलकर यांचीही नावे आहेत. परंतु त्यांची स्वाक्षरी नाही. हे सर्व भारिप सोडत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.