नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुक अंतिम टप्प्यात आली असून राजकीय नेतेमंडळी एकमेकांवर टोकाचे आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे. केवळ राष्ट्रीय सुरक्षा राष्ट्रवादाचा मुद्दा नसून देशातील मुलभूत समस्या सोडविणे देखील राष्ट्रवादच असल्याचं तेजस्वी यांनी म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
सत्तेत येताना मोदी सरकारने विकासाची जी आश्वासने दिली त्या मुद्दावर ते बोलत नाहीत तर मोदीजी सध्या फक्त राष्ट्रवादाची भाषा करतात. गेल्या पाच वर्षात भाजपा सरकारने विकासाचं राजकारण नाही तर विनाशाचं राजकारण केले आहे. मात्र देशातील बेरोजगार युवकांना नोकऱ्या देऊन मजबूत करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, महागाई कमी करणे हा देखील एक राष्ट्रवादच आहे असे तेजस्वी यादव यांनी सांगितले.
यावेळी तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्याविरुद्ध नारा दिला. ‘ऐसा कोई सगा नाही, जिसे पलटू चाचाने ठगा नही’. नितीश कुमार यांच्या जवळचा एकही व्यक्ती असा नाही, ज्याचा त्यांनी विश्वासघात केला नाही. ते जिथे जातील त्यांना बुडवतील अशी त्यांची प्रतिमा आहे लालू प्रसाद यादव यांनी कायम भाजपविरुद्ध लढा दिला आहे. कधीही मागे हटले नाही. परंतु, नितीश कुमार हे पलटू चाचा असल्याचे तेजस्वी म्हणाले.
स्वत:ला पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पुढे आणण्यासाठी नितीश कुमार प्रयत्न करत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षीत यश मिळणार नाही. असा दावा तेजस्वी यादव यांनी केला आहे.