यवतमाळ : बहुजननामा ऑनलाईन – ओबीसी आरक्षण बचाव समितीद्वारे १२ फेब्रुवारीला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील श्रोतृ सभागृहामध्ये दु. १२:३० वाजता. ओबीसी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या ओबीसी एल्गार परिषदेला माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे, माजी खासदार नाना पटोले, आ. हरिभाऊ राठोड, ओबीसी अभ्यासक प्रा. श्रावण देवरे बालाजी शिंदे, अरुण खरमाटे आदी नेते उपस्थित राहणार आहे. या नियोजनासाठी बंजारा, भटके-विमुक्त, बारा बलुतेदारांची बैठक विश्रामगृहात घेण्यात आली.
मंडल आयोगाप्रमाणे ओबीसींना ५२ टक्के आरक्षण देण्यात यावे, ओबीसीसह सर्व जातींची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी व मंडल आयोगाची १०० टक्के अंमलबजावणी करण्यात यावी, ओबीसींवर घटनाबाह्य लादण्यात आलेली क्रिमिलेअरची अट रद्द करण्यात यावी, महात्मा जोतिराव फुले तसेच सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान देण्यात यावा, ओबीसी खासदार-आमदारांकरिता ५२ टक्के स्वतंत्र मतदारसंघ राखीव ठेवण्यात यावेत, ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के स्कॉलरशिप देण्यात यावी, ओबीसींच्या लोकसंख्येनुसार केंद्रीय बजेटमध्ये त्यांच्यासाठी बजेटच्या ५२ टक्के आर्थिक तरतूद करण्यात यावी, भूमिहीनांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतून जमिनी देण्यात यावे, सर्वच शेतकरी, शेतमजुरांना पेन्शन योजना लागू करावी, बजेटच्या ५२ टक्के निधीची शासकीय कामे, कंत्राटदारांना देण्यात यावी, ओबीसींसाठी बार्टीच्या धर्तीवर संशोधन संस्था निर्माण करण्यात यावी, विदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ओबीसींचे ५२ टक्के विद्यार्थी शासकीय खर्चाने पाठविण्यात यावे.
आदी मागण्यांबाबत चर्चा करून सरकार दरबारी मागणी करण्यात येणार आहे. एल्गार परिषद यशस्वी करण्यासाठी दररोज विविध समाजाच्या बैठका घेण्यात येत आहे. ६ फेब्रुवारीला स्थानिक विश्रामगृहात बंजारा, भटके-विमुक्त, बारा बलुतेदार समाजाची बैठक पार पडली. या बैठकीला देवानंद पवार, नवलकिशोर राठोड, प्रा. बळी राठोड इंजिनीअर नारायण शिंदे, प्रा. चिंते, प्रा. महेश राठोड, झुंबरसिंग चव्हाण, बाबूसिंग कडेल, संजय राठोड, संजय चुनारकर, संतोष मोतेवार, मारोतराव पडाळ, बाबाराव राठोड, नवीन राठोड, जवाहर राठोड, शांताराम राठोड, प्रा.गोपाल राठोड, पुनिराम राठोड, रमेश राठोड, सवाई गुरुजी, टी. टी. जाधव, सुभाष पवार, लालसिंग अजमेरकर, राजा चव्हाण आदी कार्यकर्ते हजर होते. एल्गार परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ. दिलीप गावडे, डॉ. ज्ञानेश्वर गोरे, प्रदीप वादाफळे, उत्तम गुल्हाने, विलास काळे. रमेश गिरोळकर, राहुल पाटील आदी परिश्रम घेत आहेत.