मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या सरकारने अद्याप पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा २२ फेबुवारीला आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा क्रांती महामोर्चाचे समन्वयक प्रा. संभाजी पाटील यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे दिली.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) तत्काळ कार्यान्वित करावी. त्याचबरोवर राज्यव्यापी मोर्चाच्या वेळी आपला जीव गमावलेल्या तसेच मराठा क्रांती महामोर्चा महाराष्ट्र बंद आंदोलनादरम्यान आत्मबलिदान दिलेल्या समाजबांधवांना आर्थिक मदत मिळावी, या मागण्या सरकारने मान्य केल्या नाहीत. तसेच शासनाच्या वतीने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतिगृह सुरू करून सामाजिक न्याय विभागामार्फत इतर मागासवर्गीय वसतिगृह, अल्पसंख्याक वसतिगृह ज्या पद्धतीने चालवली जातात, त्याच पद्धतीने हेही कायमस्वरूपी चालवावे. मराठा आंदोलनादरम्यान आंदोलकांवर झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे. त्याचबरोबर अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील युवकांना बिनव्याजी कर्ज देण्यात यावे व अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ हे केवळ मराठा समाजासाठीच असावे, असे सांगत, व्याज परतावा ही योजना मराठा समाजासाठी दिशाभूल करणारी आहे, असेही पाटील म्हणाले.