नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद आणि महात्मा जोतिबा फुले अशा तिघांच्या पुतळ्याच्या उभारणीची मागणी विविध संघटनांनी केली होती. मात्र विद्यापीठाने यासाठी परवानगी दिल्यानंतर त्या संघटनांकडून अद्याप एक खडकूही मिळाले नाही. त्यामुळे पाच वर्षांपासून शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आलेला नाही. तर काही महिन्यांआधी परवानगी मिळालेल्या इतर दोन पुतळ्यांच्या बाबतीतही हीच अवस्था आहे.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारत परिसराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसर’ असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा, अशी मागणी बऱ्याच राजकीय आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात आली होती. विद्यापीठाने त्यावर एक समिती तयार करून पुतळ्यासंदर्भात असलेल्या केंद्र शासनाच्या नियमावलीप्रमाणे आराखडा आणि जागा देण्याची तयारी दर्शविली. मात्र नियमावलीनुसार ज्या संघटना वा संस्थेने त्याची मागणी केली आहे, पुतळ्यासाठी त्यांच्याचकडून निधी घेण्यात यावा, असे नमूद केले आहे. याच नियमाचा आधार घेत विद्यापीठाने मागणी करणाऱ्या संघटनांना आवाहन केले.
चार वर्षांपासून एकाही संघटना वा राजकीय पक्षाने त्यासाठी एक रुपयाचा निधी दिलेला नाही. त्यामुळे अद्याप या परिसरात पुतळा बसविता आलेला नाही. तर काही महिन्यांआधी काही संघटनांनी अमरावती मार्गावरील विद्यापीठ परिसरामध्ये स्वामी विवेकानंद आणि महात्मा फुले यांचा पुतळा बसविण्यासाठी व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली होती. मात्र निधी गोळा करण्याचे काम ‘जैसे थे’ स्थितीमध्ये आहे. त्यामुळे पुतळ्याचे केवळ राजकारण करण्यापेक्षा प्रत्यक्षात त्या व्यक्तीच्या विचाराचे जतन करणे हे तेवढेच मोठे कार्य असल्याचे दिसून येते. केवळ शिवाजी महाराजच नव्हे तर जोतिबा फुले आणि स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची मागणी करणाऱ्यांनीही त्यांच्या विचाराचे पाईक असणे तेवढेच महत्त्वाचे आहे.