नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन –केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार हा सर्वोच्च नागरी किताब देण्याचा विचार सुरु आहे. येत्या २६ जानेवारीला यासंदर्भात अंतिम घोषणा होण्याची शक्यता आहे. याशिवाय, उत्तर प्रदेशातील दलित नेते काशीराम यांच्या नावाचाही केंद्र सरकार भारतरत्न पुरस्कारासाठी विचार करत असल्याचे समजते.
लोकसभेच्या निवडणुका जवळ येत असल्याने मोदी सरकार आणखी एका राजकीय ‘सर्जिकल स्ट्राईक’ची तयारी करत आहे. खुल्या वर्गातल्या गरिबांना 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे विरोधी पक्षांच्या तंबूत आधीच खळबळ उडाली आहे.
सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पेटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांसाठी सरकाने अनेक निर्णय तातडीने घेतले. त्याला जोडूनच आता भारतरत्नचा निर्णयही होऊ शकते अशी शक्यता आहे. ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
गेल्या महिन्यात हिंदी भाषिक पट्ट्यातील मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या तीन राज्यांतील निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. त्यामुळे मोदी सरकार खडबडून जागे झाले असून मतदारांना आपल्याकडे पुन्हा आकृष्ट करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. एवढेच नव्हे सरकारने विरोधकांना यावर आक्षेप घेण्याची कोणतीही संधी न देता अवघ्या दोन दिवसांत यासाठीचे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करून घेतले होते.