नागपूर : बहुजननामा ऑनलाइन – “जर संविधानाला कोणत्या नेत्याकडून धोका असेल तर ते नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत” असा गंभीर आरोप काँग्रेस सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे.
प्रदेश काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेची सुरवात नागपूर येथील दीक्षाभूमीवरून सुरू झाली असून आज सकाळी जनसंघर्ष यात्रेचे नागपुरात आगमन झाले. दरम्यान पत्रकारांशी बोलतांना “आज संघर्ष यात्रेची सुरुवात करताना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. ज्या मोदींनी २०१४ मध्ये संविधानाला साक्षी ठेऊन पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेच मोदी आज संविधानासाठी घातक ठरत आहेत.”
इतकेच नव्हे तर २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला. याचबरोबर “२०१४मध्ये मोदींनी जनतेला मोठे मोठे वायदे करून भुरळ पाडली मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांनी जनतेला दिलेला शब्द पाळला नाही. मोदींच्या या फसव्या वृत्तीमुळे जनतेचा त्यांच्यावरचा रोष वाढत चालला आहे.” असे काँग्रेस सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी म्हंटले आहे.
इतकेच नव्हे तर ५ राज्यांतील नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपचा जनतेने दारुण पराभव केला आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ मध्ये जनादेशाच्या बाता करणाऱ्या भाजपला येथील सत्तेवरून पायउतार व्हावे लागले आहे. असेही ते म्हंटले.