मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात मागील काही दिवसांपासून तापमानात कमालीचा बदल होत असल्याचे पहायला मिळत आहे. अवकाळी पावसाचा जोर कमी होताच राज्यातील उष्णता वाढू लागली आहे. एकीकडे काही भागात पाऊस तर दुसरीकडे काही शहरांमध्ये कमालीचे तापमान वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. मंगळवार (दि.19) पासून राज्यात पुढचे काही दिवस तापमानाचा पारा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
बंगालच्या उपसागरात अम्फान चक्रीवादळ आल्यामुळे उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये तुफान वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. तर दुसरीकडे येणाऱ्या कोरड्य वाऱ्यामुळे गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रातील विदर्भात तापमानाचा पारा वाढणार आहे. त्यामुळे उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मुंबईसह कोकणात ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडतील असं सांगण्यात आले आहे.
सोमवारी पुन्हा एकदा कमालीचं तापमान वाढल्यानं नागरिकांना उकाड्याने हैराण केले. जळगावचे तापमान 44 तर नागपूरचे तापमान 42 डिग्री सेल्सियस पर्यंत गेले. अकोला व यवतमाळ येथे येत्या चार दिवसात उष्माघाताचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये सर्वात जास्त उन्हाचे चटके बसणार आहेत. अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यातील एक-दोन ठिकाण 19 ते 22 या दरम्यान उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील सोमवारचे तापमान
पुणे – 38.8, धुळे – 42.2, जळगाव – 44.0, मालेगाव – 41.4, सोलापूर – 43.3, परभणी – 42.4, नांदेड – 41.0, औरंगाबाद – 40.6, नागपूर – 41.7, वर्धा – 40.0, बुलडाणा – 40.2, चंद्रपूर – 40.0, गोंदिया 40.8