मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. काही अटी आणि शर्तींसह गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचं परब यांनी सांगितलं आहे.
कोकणात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र, यंदा कोरोना संसर्गाचे सावट असल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले केले आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यासह राज्यातील विविध भागातील चाकरमानी गणेशोत्सवात कोकणात जातो. त्यामुळे आम्ही आयसीएमआरच्या गाईडलाईन्स मागवल्या असून या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने अटी शर्ती आणि नियमांचं पालन करुन चाकरमान्यांच्या प्रकृतीची काळजी घेत एसटीची सेवा उपलब्ध करुन दिली जाईल, असं अनिल परब यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं आहे.
तसेच गणेशोत्सव साधेपणाने कसा साजरा केला जाईल. गर्दी आणि पर्यायाने कोकणात कोरोना संसर्गाचा प्रसार वाढू नये, यासंदर्भात विचार चालू आहे. जे चाकरमानी फक्त गणेशोत्सवासाठी कोकणात जातात, अथवा ज्या लोकांची घरे बंद असतात त्यांनी कोकणात पाठवण्याची जबाबदारी सरकार घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. एका दिवसासाठी आणि पाच दिवसांसाठी कोकणात शेकडो चाकरमानी जातात. त्यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा, याचा सुद्धा विचार सुरु आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मंडळांशी चर्चा करुन त्यावरती निर्णय घेऊ, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.
सरकारने गणेशोत्सवासाठी वेळकाढू भूमिका घेतलेली नाही. तर मुंबई, ठाणे पुण्यातून कोकणात जाणारे लोक आमचेच असून कोकणातील लोकही आमचेच आहेत. या सर्वांची काळजी करणे हे सरकारचे कर्तव्य असून त्यापद्धतीने सरकार निर्णय जाहीर करेल, असं सुद्धा परब म्हणाले.