मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – जनगणनेची लवकरच सुरुवात होणार असून त्यासाठी मोठ्या संख्येने शिक्षकांच्या नेमणूक करण्यात येणार असून शिक्षकांच्या मे महिन्यातील सुट्ट्या रद्द होणार आहेत. तशी नोटीस जनगणना अधिकाऱ्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवली आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये नाराजी असून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने या निर्णयाचा निषेध केला आहे. तसेच हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणीही परिषदेने केली आहे.
२०२१ मध्ये जनगणना करण्यात येणार असून १ मे २०२० ते १५ २०२० या कालावधीत जनगणनेचा पहिला टप्पा सुरु होणार आहे. यामध्ये घरांना क्रमांक देणे, गटाची विभागणी, घर यादी तयार करणे आदी कामे करण्यात येणार असून त्यासाठीच शिक्षकांच्या नेमणूक करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्या मे महिन्यातील सुट्ट्या रद्द केल्या असून वर्षातील ७६ पैकी ३९ सुट्ट्यांना शिक्षकांना मुकावे लागणार आहे. महापालिका, खासगी शाळांमधील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना मुख्यालय सोडून जाऊ नये, अशा सूचना या नोटीसद्वारे देण्यात आली आहे. तसेच मुख्यालय सोडून गेल्यास मुख्याध्यापकांना जबाबदार धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मुंबईतील कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी कोणत्याही कामासाठी शिक्षकच का नेमावे लागतात? त्यांच्या सुट्ट्यांवर गदा का आणली जाते? इतर कर्मचाऱ्यांकडे हे काम का सोपवले जात नाही?, असे प्रश्न केले आहेत. तसेच आम्ही जनगणना अधिकाऱ्यांची भेट घेऊन शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द करू नयेत, अशी मागणी करणार आहोत. त्या कालावधीत त्यांना कुटुंबासोबत बाहेर जावे लागते. तसेच काही शिक्षकांना बोर्डाचे पेपर तपासण्याचेही काम असते, असेही ते एका वृत्तसंस्थेसोबत बोलताना म्हणाले आहेत.